Pages

Sunday 19 June 2011

चारोळ्या


तुझ्या मध्ये मला मी, 
    खूप शोधून पाहिलं,
माझ्यामध्ये  तुला मात्र, 
   शोधावच नाही लागलं.




           
 तुझ्या आणि माझ्या मध्ये
     कधीच नव्हता दुरावा,
 मला हे माहित आहे,
     पण तूच मागशील पुरावा .



Saturday 18 June 2011

Monday 6 June 2011

किमया मोजक्या शब्दांची


        शब्दांमध्ये जादू  असते, असे विधान आपण वारंवार ऐकतो, अक्षर अक्षर जोडून तयार  झालेले हे शब्द     जेव्हा मोजकेच वापरले जातात , तेव्हा त्यांच्यात जादू भरली जाते. हे मोजके शब्द भाषेचे सौंदर्य वाढवतात.
       
     शब्दांचे भले मोठे बोचके घेऊन हिंडण्यापेक्षा  त्या ऐवजी मोजके शब्द वापरले तर सुटसुटीतपणा येतो . या मोजक्या शब्दाचा  उपयोग  कधी कधी रेशमी चिमटे काढण्यासाठी होतो , तर कधी एखाद्याची  कानउघडणी करण्यासाठीही होतो .
शहाण्याला शब्दांचा मार म्हणतात ते तेवढ्यासाठीच.हे मोजके शब्द जास्त बडबड न करता पाहिजे तो अचूक परिणाम साधून देतात.
        
        हे मोजके शब्द कधी गोड तरी कधी कडू .कधी पिढ्या पिढ्यांचे वैर मिटवू शकतात, तर कधी क्षणार्धात जन्मजन्मांतरीचे नाते तोडू शकतात.काही शब्द कडू औषधांप्रमाणे हितकारक असतात. तर खोट्या प्रशंसेचे गोड शब्द अहित करू शकतात.....कावळा आणि कोल्ह्याची गोष्ट सर्वश्रुतच आहे .
काही शब्द ओले असतात , भावनांच्या सरी ने भिजलेले ........!तर काही कोरडे असतात, मनात भावना नसली तरी वापरावे लागणारे ..! काही शब्द मुळमुळीत तर काही धारदार असतात.शब्दाने (कि अपशब्दाने) व्यक्त केलेला राग एखाद्यावर परिणाम करून जातोच ना?
         
        काही मोजके शब्द फसवे असतात . शहाणा या शब्दाचा अर्थ खरंतर बुद्धिमान , परंतु " ए शहण्या " असे जेव्हा म्हटलं जातं तेव्हा त्या मागे कुत्सित भावच असतो.
 हे मोजके शब्द प्रवासात पण आपले किती मनोरंजन करतात नाही का ? डोंगरावर , रस्त्यावरच्या    पाट्यांवर,तर कधी वाहनांवर लिहिलेली , " शिकेल  तो टिकेल " , वाचाल तर वाचाल ,तसेच  मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक, नजर  ह्टी दुर्घटना घटी, किंवा  safety on road is safe tea at Home , अशी  सुंदर सूचक वाक्य  बेभान  माणसांना भानावर  आणतात  .

          एखाद्याने आपले काम केले कि आपण "Thank-you" , चूक केल्यास "sorry" म्हणतो   .हे शब्द हुकमी एक्क्याचे काम करतात .Good Morning,Good Night   हे मोजके शब्द सर्वांचेच लाडके आहेत .परंतु मराठी भाषा इतकी इंग्रजाळलेली आहे कि Good Afternoon ऐवजी " शुभ दुपार  "कोणी म्हटलं तर त्यावर  नसती  शंकाच  घेतली जाईल.
ह्या मोजक्या शब्दांची खरी कसरत न्यायालयात पाह्यला मिळते .एखादी केस चालू असताना दोन्ही पक्षाच्या वकिलांनी आपआपल्या अशिलाला शिकवून ठेवलेले  मोजके शब्द जर चुकीचे उच्चारले गेले तर "point to be noted" हे विरुद्ध पक्षाच्या वकिलाचे मोजके शब्द ऐकावे लागतात .संपूर्ण केस चा निकाल त्यावरच अवलंबून असतो, कारण न्यायदेवतेने  डोळ्यावर पट्टी बांधली आहे , कानावर नाही .
         
         सुबक मोजक्या शब्दांची खरी गरज जाहिरातीसाठी असते . "जोर का झटका धीरे से लगे" ," ढूंढते रह जाओगे" या सारख्या जाहिरातींचे शब्द जागो जागी वापरले जातात.
आपला लाडका  टीव्ही शो "कौन बनेगा करोडपती " मधील अमिताभ बच्चन(बिग बी ) च्या तोंडचे ," Sure ? confident ? Lock kar diya jaye ?" हे मोजके शब्द  "Big Hit" होऊन  गेले .
 मोजक्या शब्दांचा महत्वाचा उपयोग युद्ध क्षेत्रात होतो .तातडीचे संदेश मोजक्या सांकेतिक  शब्दात , मोजक्या वेळात  पोहचवणे , अत्यंत कौशल्याचे काम आहे ..
        
        "विचारपूर्वक बोललेले शब्द  शास्त्र  बनतात ,अविचाराने बोललेले शब्द शस्त्र बनतात", असे म्हटले जाते.
 शिकागो येथील धर्म परिषदेत भाषण करण्यास गेलेल्या स्वामी विवेकानंद ह्यांनी भाषणाची सुरुवातच  "My Brothers and Sisters of America" अश्या मोजक्या शब्दांनी केली, आणि ते शब्द श्रोत्यांच्या थेट हृदयाला जाऊन भिडले .
"हर हर महादेव" ह्या मोजक्या किमयागार शब्दांनी मराठ्यांचा इतिहास घडवला.
"वंदे मातरम " , " अंग्रेज भारत छोडो ", " करेंगे या मरेंगे "  ह्या मोजक्या शब्दांनी  स्वतंत्र भारत घडवला .
असे हे शब्द कधी शांती दूताचे  काम करतात ,कधी हुकुमशाह तर कधी प्रेमदूत बनतात.
 हे मोजके शब्द कधी कधी परिसाचे काम करतात .माता - पिता तसेच गुरूंच्या आशीर्वादाच्या  मोजक्या शब्दांचा परीस आपल्या  बुद्धीचे सोने करतो ." आयुष्यमान  भव " , "कीर्तिमान भव "  ,"यशस्वी भव" या सारख्या आशीर्वादाचे मोजके शब्द भारतीय संस्कृतीचे  मुकुटमणी आहेत .

         "ओम नमो भगवते वासुदेवाय " ! हे मोजके शब्द जेव्हा मंत्र रूपाने जपले गेले , तेव्हा बाल भक्त प्रल्हादासाठी प्रत्यक्ष परमेश्वराला अवतरावे लागले .
"राम" ह्या शब्दाचे सामर्थ्य इतके  , कि त्याच्या जपामुळे महा पापी वाल्याचे रुपांतर  .."वाल्मिकी" ऋषित झाले 
नुसत्या "ओम" च्या उच्चारणाने मानवाच्या जीवनात क्रांती घडू शकते . 


    असे हे जीवन घडवणारे मोजके शब्द कधी कधी  कळीच्या नारदाचे सुद्धा काम करून जीवन बिघडवू शकतात.
शब्दांना दोष देण्यात काय अर्थ आहे? मानवाच्या हातातील ते कठपुतलीच आहेत.पेशवेकालीन उदाहरणावरून हे तंतोतंत पटते.
पेशवे नारायणराव यांना   बंदिस्त  करून आपण पेशवा व्हावे  या इच्छेखातर  राघोबा दादांनी ,"नारायणरावाला धरावे " असे फर्मान काढले . परंतु त्यांची कारस्थानी पत्नी आनंदीबाई हिने   "ध" चा "मा" करून " नारायणरावाला मारावे " असे फर्मान पाठविले  .त्या  हुकुमानुसार   नारायणरावांची  हत्या  झाली  आणि  ह्या  मोजक्या  शब्दांनी  पेशवाई  हादरली  .
 तसेच पुराणातील उदाहरण घ्यावे , तर पांडव पत्नी द्रौपदीने ,दुर्योधनाला उद्देशून बोललेले " अन्धाचा पुत्र अंध " तसेच  सूर्यपुत्र कर्णाला "सूतपुत्र" म्हणून हिणावलेले शब्द ठिणगी बनले, आणि महाभारतात वणवा पेटवण्यास कारणीभूत ठरले .
संपूर्ण  रामायणात डोकावून पहिले तर लक्षात येईल कि राजा दशरथाने ,राणी कैकयीला  दिलेल्या  मोजक्या शब्दांचा वचनामुळे प्रभू रामचंद्रांना , किंबहुना सर्व अयोध्या वासियांना वनवास भोगावा लागला .कैकयीला दिलेल्या मोजक्या शब्दांचे वरदान जणू शापच ठरले .
वनवासात असताना लक्ष्मणाने सीतेच्या संरक्षणार्थ पर्णकुटीभोवती मंत्रोच्चाराने रेष मारली .ती रेष जो कोणी ओलांडेल तो भस्म होईल एवढी तीव्र शक्ती तिच्यात होती. सर्व मायावी विद्यांमध्ये  पारंगत लंकाधिपती रावणही ती लक्ष्मणरेषा ओलांडू शकत नव्हता , असे असतात हे मोजके शब्द सर्व शक्तिमान....!.या नंतर 
साध्या धोब्या ने घेतलेल्या शंकेने  महादेवी सीतेला अग्नी-परीक्षा द्यावी लागली.आणि संपूर्ण रामायणाचा अंत अश्रूमय झाला .
             
           सर्व मोजके शब्द भावनांची देवाण घेवाण करतात .वक्त्याचे  अंतरंग उलगडण्याचे काम करतात .
श्रावण सरी  होऊन बरसले तर एखाद्याचे जीवन फुलवून टाकतात .सांत्वनाचे मोजके शब्द दुखी जीवाला वाळवंटातील  ओएसिस प्रमाणे वाटतात .
 "निंदकाचे घर असावे शेजारी म्हणतात." निंदेचे मोजके शब्द ऐकल्या शिवाय प्रगती होणार कशी .?

              शस्त्राने केलेला घाव  वैद्याच्या औषधाने बरा  होऊ शकतो , परंतु कटू शब्दाने केलेला घाव कोणी भरून काढू शकत नाही . 
अहिंसा परमो धर्मः हि संतवाणी आहे .हिंसा शस्त्रानेच नाही तर कटू शब्दानेही होते. शाब्दिक अहिंसा म्हणजे सांत्वनपूर्वक  बोललेले तालबद्ध मधुर शब्द !
जीवन जगण्यास  खरी मजा तेव्हाच येते जेव्हा आपले मोजके शब्द झेलून घेणारे आपले कोणी तरी असते .
संत तुलसीदास जीवनातील महान रहस्य उलगडून दाखवताना म्हणतात 
                        तुलसी मिठे वचन ते , सुख उपजत चहू ओर 
                         वशीकरण ये मंत्र है,   त्यज दे वचन कठोर !



            


          






      













         















Protected by Copyscape Web Copyright Checker


Wednesday 1 June 2011

चारोळ्या


फक्त एक तूच माझा
  बाकी  सारं नश्वर आहे,
  रोमारोमात भिनलेला ,
   तूच एक ईश्वर आहेस. 






                                       



दिखाव्याच्या जगात
 पांढऱ्या ढगांना  महत्व  असतं,
बरसणाऱ्या काळ्या कुट्ट
 मेघांना कोण विचारत नसतं.......!



या सर्व वाहनांवर ,
     माझा थोडा रोष आहे,
               भेटी नंतर विरह घडवायचा ,
       त्यांना भारी सोस आहे.
                                                 
                                                                     



मैत्री करावी अशी , 
      जशी दगडावरची भेग,
             तुझ्या मैत्रीसारखी नसावी ,
           वाळूवरची रेघ................!   
                                                                                                    




                                                                   






                                                                                 
                                           







प्रेमाच्या चक्रव्युहात,         
  आत जायला शिकावे,
 पूर्ण पणे आत गेल्यावर
   बाहेर येणे विसरावे. 
      
















                                        
                                                               


                                 

धुंद तारे मंद वारे,
  न मळलेली वाट  ,
    मंद झाले धुंद तारे ,
       झाली वाटेची वहिवाट 



                                                                                 












Protected by Copyscape Web Copyright Checker